महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. 85-85-85 असा फॉर्म्युला ठरण्यात आला आहे. मात्र या फॉर्म्युल्यावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस निवडणूक समितीची बैठक काही वेळापूर्वी दिल्लीत पार पडली. यानंतर महाराष्ट्र निवडणूक प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आमची दुसरी यादी लवकरच येईल असं म्हटलं. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राहुल गांधी जागावाटपाच्या फॉर्म्युलावर नाराज आहेत का? असं विचारलं तेव्हा त्यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.
काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत राहुल गांधी नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काँग्रेस जागावाटपात कमी पडल्याची खंत व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेसची आक्रमकता कमी पडल्याचं राहुल गांधींनी वक्तव्य केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जागावाटपात काँग्रेसला 100 आकडाही गाठता आला नसल्याबाबत राहुल गांधी नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
रमेश चेन्निथला काय म्हणाले?
“आज आमच्या काँग्रेसची बैठक पार पडली, आम्ही इतर जागांवर चर्चा केली. जी यादी ठरवली आहे ती यादी लवकरच तुम्हाला मिळेल. काँग्रेसची शनिवारी आणखी एक बैठक होणार आहे ती ऑनलाईन स्वरुपाची असेल. त्यानंतर आम्ही सगळ्या जागा घोषित करु. महाविकास आघाडी एकत्रितपणे समोर जात आहोत. आघाडी म्हटल्यानंतर थोडंफार जागांवरुन काही गोष्टी घडतात. महाराष्ट्रातील जनतेची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला हा विश्वास आहे की महाविकास आघाडीच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल. या भ्रष्ट सरकारला हटवण्यासाठी लोक आतूर आहेत. लोकसभेला जसे निकाल लागले तसेच निकाल येत्या विधानसभेलाही लागलेले दिसतील.” असं चेन्निथला म्हणाले आहेत.