ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राजद्रोहाचा कायदा रद्द करण्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी राजद्रोहाच्या कायद्यावरुन अमित शहांना एक प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले की, डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना वाचवण्यासाठी सरकार देशद्रोहाचा कायदा हटवतोय का ?
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, या देशात कोणीही देशद्रोही नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, ज्या व्यक्तीवर देशद्रोहाचा कायदा लावला पाहिजे, त्या व्यक्तीवर मात्र तुम्ही हा कायदा लावलेलाच नाही. शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर तुम्ही देशद्रोहाचा कायदा लावला नाही. त्यांनी पाकिस्तानला देशाची गोपनिय माहिती पुरवली. शास्त्रज्ञ आरएसएसचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही देशद्रोहाचा रद्द करत आहात का?
कुरुलकर यांच्यासारखे असे अनेक लोक आहेत. ज्यांच्यावर हा कायदा लावला पाहिजे. देशद्रोहाचा कायदा काढला. तो कुणाला वाचवण्यासाठी काढला का? असे दहा उदाहरणे मी देऊ शकतो, असा दावाही राऊत यांनी केला आहे.