शिवाजीनगर झोपडपट्टीवरील कारवाईवरून संजय दीना पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. लोकसभेला मतं दिली नाही म्हणून मुस्लिमांची घरं तोडत आहेत असा हल्लाबोल त्यांनी केलेला आहे. खासदार संजय दीना पाटलांची कारवाईवरून टीका केली आहे. लोकांना विनाकारण त्रास देण्याचे काम सुरू आहे असंही संजय दीना पाटील म्हणाले. आतापर्यंत अधिकृत असलेली घरं अचानक अनधिकृत कशी झाली असा सवालही संजय दीना पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आधी लोकांना बांगलादेशी पाकिस्तानी ठरवलं आणि आता सूड बुद्धीने कारवाई केली जात आहे. ते लोक तिथे 35-40 वर्ष राहतात मग या आधी का कारवाई केली नाही. तिथल्या स्थानिक आमदाराला ईडी सीबीआय अशा सर्व धमक्या दिल्या आणि म्हणून कदाचित त्यांनी विधानसभेत या बांधकामाविरोधात आवाज उचलला. असंच जर सुरू राहिलं तर लोकसभेत त्यांना फटका बसला आहेच पण विधानसभेत लोक त्यांना संपूर्ण घरी बसवतील. मला फक्त मुसलमान लोकांनी वोट नाही केले, तिथे फक्त मुस्लिम लोक राहत नाहीत. तिथे सर्व धर्मीय म्हणजे हिंदू दलित असे सर्व लोक आहेत आणि फक्त गोवंडी नाही तर मुलुंड, भांडुप, कांजूर मार्ग, विक्रोळी, घाटकोपर अशा संपूर्ण ईशान्य मुंबईत मला मतदान झाले. मला सर्व लोकांनी मतदान केले आणि मला मतदान केले म्हणून त्यांच्यावर आता राग काढला जातो आहे असं संजय दीना पाटील म्हणाले.