राज्यातील हजारो पात्रताधारकांचे लक्ष लागलेल्या शिक्षकभरती प्रक्रियेच्या जाहिराती पवित्र संकेतस्थळ्यावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. एकूण 21 हजार 678 पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. सर्वाधिक पदे जिल्हा परिषद शाळांतील असून, खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद शाळांचा समावेश आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांतील पहिली ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एकूण रिक्त जागांच्या 80 टक्के जागांवर भरती प्रक्रिया करण्याचे नियोजित आहे. शिक्षक पदांसाठीच्या बिंदुनामावलीबाबत जून ते नोव्हेंबर या कालावधीत तपासणी करण्यात आली. मात्र बिंदुनामावलीबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने जिल्हा परिषदांच्या 10 टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील 70 टक्के पदावर पदभरती केली जाणार आहे. त्या जागांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाणार आहे.