रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात सरकते जिने बसविण्यात आले आहेत. मात्र महिन्यातील मोजके दिवस सोडले, तर इतर दिवशी हे सरकते जिने बंद असल्याने प्रवाशांना त्यावरुन चढत प्रवास करावा लागतो. याचा ज्येष्ठ नागरिक, सामानाची वाहतूक करणारे प्रवासी, गरोदर महिला, आजारी व्यक्ती यांसह दिव्यांग नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
सध्याच्या घडीला उन्हाळ्याचे दिवस असून अनेक नागरिकांना उष्माच्या त्रासाने प्रवास करुन आल्यानंतर जिने चढून प्रवास करणे शक्य होत नाही. मात्र पर्याय नसल्याने प्रवाशांना या सरत्या जिन्यावरून चालत जावे लागत असल्याने प्रवासी वर्गात संतापाचे वातावरण असून रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करत प्रवासी संतप्त प्रतिक्रिया देत आहे.