संगमनेरच्या धांदरफळ खुर्द येथे माजी खासदार सुजय विखे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते. यावेळी या प्रचारार्थ सभेत बोलताना वसंतराव देशमुख यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले.
वसंतराव देशमुख यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आता संगमनेरमध्ये तणावाचे वातावरण आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर महिला भगिनींचा अपमान केल्याने स्थानिक महिला एकत्र येत सभास्थळी ठीय्या सुरू केला.
याच पार्श्वभूमीवर आता जयश्री थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयश्री थोरात म्हणाल्या की, जे काही घडलं ते अतिशय वाईट आहे. हे जे काही झालेलं आहे ते कुणालाही न शोभणारे आहे. तुम्ही म्हणता महिलांना 50 टक्के आरक्षण राजकारणामध्ये द्यायचं. पण जर असे बोलणारे लोक असतील तर महिलांनी का बरं राजकारणामध्ये यावं आणि मी काय करत होते. काय वाईट करत होते. मी माझ्या वडिलांसाठी मैदानात होते. मी माझ्या वडिलांसाठी युवा संवाद यात्रेमध्ये प्रत्येक माणसाला भेटण्याचे काम करत होते, प्रत्येक युवकाला भेटण्याचे काम करत होते. असं काय केलं होते की, एवढं माझ्याबद्दल वाईट बोलले पाहिजे. ते त्यांच्या वयाला शोभणारे आहे का?
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, तुम्ही त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहात. भाषणामध्ये तुम्ही असे गलिच्छ किती खालच्या पातळीवर बोलत आहेत. त्यांच्या वयाला शोभणारे नाही, कोणालाच शोभणारे नाही. ते विरोधक राहिलेलं आहेत पण विरोधकाला पण एक पातळी असते. एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन तुमच्या मुलीच्या, तुमच्या नातीच्या वयाच्या मुलीबद्दल तुम्ही असे बोलत आहात हे त्यांना शोभणारे नाही. असे जयश्री थोरात म्हणाल्या.