मीरा भाईंदर ते वसई, विरार या शहरांतील अंतर कमी करणाऱ्या रो-रो सेवेला आजपासून प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वसई खाडीत वसई-भाईंदरदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. या रो-रो बोटीचे सुरक्षित नौकानयन, बोटीतून प्रवासी व वाहनांचे सुलभ चढ-उतार आणि सुयोग्य नौकानयन मार्ग या सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर या फेरीबोट सेवेचा लोकार्पण सोहळा औपचारिकरित्या करण्यात येणार आहे.
सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत ही फेरीबोट चालवली जाणार आहे. या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवासी इतकी असणार आहे. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांचा हा समुद्री मार्ग असणार आहे. आज या समुद्री मार्गातील रो रो सेवेची सुरुवात झाल्यानंतर अनेक स्थानिक नागरिकांनी या बोटीतून प्रवास केला. ही सेवा ३ महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली असून भरती व ओहोटीच्या वेळी या फेरीबोटीच्या मार्गात बदल होणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाकडून देण्यात आली आहे.