Uday Samant Press Conference : ४ जूननंतर यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. छोटे-मोठे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावे लागतील, असं शरद पवार म्हणाले होते. उबाठाला विलीन करण्याची आवश्यकता नाही. तो पक्ष आधीच काँग्रेसमध्ये विलीन झाला आहे. उबाठा मुंबईत चालत नाही. राहुल गांधीच त्यांना चालवतात. उबाठाचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून नाना पटोले काम करतात. कालची शिवाजी पार्कची सभा विराट होती आणि बीकेसीची सभा कॉर्नर सभा होती. हे लोक ४ तारखेनंतर स्वत:चं अस्तित्व स्वीकारतात की मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करतात, हा मोठा प्रश्न आहे, असा सवाल उपस्थित करत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केलीय.
पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, २० तारखेला १३ जागांची निवडणूक आहे. मागच्या वेळी १३ च्या १३ जागा महायुतीला मिळाल्या होत्या. या सर्व जागा महायुती लढत आहे. काही ठिकाणी धनुष्यबाणावर लढत आहेत. तर काही ठिकाणी कमळावर लढत आहेत. महायुतीच्या सर्व १३ जागा निवडून येतील. महाविकास आघाडीचे कितीही ईव्हेंट झाले, तरी नरेंद्र मोदी यांना देशाच्या पंतप्रधानपदावरून कुणीही बाजूला करु शकत नाही. एव्हढं चागलं काम त्यांनी या देशासाठी केलं आहे. विरोधकांनी ज्या पद्धतीनं महायुतीच्या नेत्यांची बदनामी करण्याचं काम केलं आहे, त्याचं उत्तर त्यांना नक्की मिळेल.
कार्यकर्त्यांचे, उमेदवारांचे कार्यालय फोडण्यावर ही सर्व मंडळी गेलेली आहे. माझी पोलीस खात्याला विनंती आहे, काल जे कार्यालय फोडण्यात आले आहेत, यामागे कोण सूत्रधार आहेत, यामागे कोण गुंड आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पंतप्रधान मोदींचं सरकार बदलेल, असा दावा विरोधक करत आहेत, यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, स्वप्न पाहायला पैसे लागत नाहीत. त्याच्यावर कर लागत नाही. त्यावर जीएसटी किंवा व्हॅट लागत नाही, असंही सामंत म्हणाले.