जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर रियासी जिल्ह्यात बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर बस दरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला. तर या दुर्घटनेत 33 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला काही वर्षांपूर्वी अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याच्या धर्तीवर करण्यात आला आहे, जो गेल्या दशकात जम्मूमध्ये झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.
वैष्णोदेवीपासून 80 किलोमीटर अंतरावर शिवखोरी हे धार्मिक स्थळ आहे. हल्लेखोरांची संख्या 3 ते 4 असण्याची शक्यता आहे, जे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून भारतात घुसल्याचा संशय आहे. गोळीबारानंतर शिव खोडी मंदिरापासून कटराकडे जाणारी 53 आसनी बस खोल खड्ड्यात पडली. पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ सायंकाळी 6:15 च्या सुमारास ही घटना घडली.
सध्या लष्कराकडून बचावकार्य सुरू आहे. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. भारतीय लष्कर, सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.