Virat Kohli Open In T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडनने टी-२० वर्ल्डकपआधी टीम इंडियाला मोठा सल्ला दिला आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने सलामीला फलंदाजीसाठी जाऊ नये. यशस्वी जैस्वालसोबत रोहित शर्माच्या जागेवर विराट कोहलीनं सलामीला फलंदाजी केली पाहिजे आणि रोहितला चौथ्या क्रमांकावर पाठवलं पाहिजे, असं हेडनने म्हटलं आहे.
आयपीएल २०२४ मध्ये विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु, पंजाबविरोधात झालेल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करून विराटने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे रोहित शर्माला यंदाच्या आयपीएल हंगामात धावांचा सूर गवसलेला नाहीय. काही इनिंगमध्ये रोहितने धावांचा पाऊस पाडला आहे. पण रोहितला अनेक सामन्यांमध्ये धावांचा डोंगर उभा करण्यात यश आलेलं नाही.
मॅथ्यू हेडन माध्यमांशी बोलताना म्हणाला, जर तुम्हाला त्या कॉम्बिनेशनमध्ये बदल करायचा असेल, तर विराट कोहलीला यशस्वी जैस्वालसोबत सलामीला पाठवा. हे पाहून मला आनंद होईल. त्यानंतर सूर्यकुमार यादवला तिसऱ्या नंबरवर आणि रोहित शर्माला चौथ्या नंबरवर ठेवा. अशाप्रकारची टॉप ४ भारतासाठी योग्य कॉम्बिनेशन आहे, असं मला वाटतं. विराट कोहली पहिल्या सहा षटकांमध्ये जबदरस्त फलंदाजी करत आहे, हे यामागचं कारण आहे.
त्यानंतर जेव्हा पॉवर हिटिंगची आवश्यकता असेल, तेव्हा तुमच्याकडे रोहित शर्मासारखा फलंदाज असेल. नंबर ४ वर फलंदाजी करून रोहित शर्मानं खूप धावा केल्या आहेत. हे आकडे त्याच्या ओपनिंगच्या आकड्यांपेक्षा चांगले आहेत. विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये १२ सामन्यांमध्ये १५३ च्या स्ट्राईक रेटने ६३४ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने १३ सामन्यांमध्ये १४५ स्ट्राईक रेटने ३४९ धावा केल्या आहेत. तर यशस्वी जैस्वालने ११ सामन्यांमध्ये १५७ च्या स्ट्राईक रेटने ३२० धावा केल्या आहेत.