अमित शाहांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात 288 जागांवर महायुती म्हणूनच निवडणूक लढणार, कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं सुनील तटकरे म्हणाले आहेत. तर अमित शाहांनी आगामी निवडणुकीबाबत मार्गदर्शन केलं, आणि त्यादरम्यान मुख्यमंत्री पदाबाबतच्या प्रस्तावाच्या चर्चेचं वृत्त देखील सुनील तटकरे यांनी फेटाळलं आहे.
काल अमित शहा यांच्या समवेत अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि मी अशी ४५ मिनिट विमान तळावर भेट झाली होती. या भेटीत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती , आगामी निवडणुका यावर चर्चा झाली. त्यादरम्यान आगामी विधानसभा निवडणुका महायुती म्हणून लढवण्यावर अमित शहा यांनी मार्गदर्शन केलं.
सुनील तटकरे म्हणाले की, हे खोट आहे, कुठल्याही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असा कोणताही विषय कालच्या बैठकीत निघाला नव्हता. महायुती 288 जागा महायुती म्हणूनच लढणार आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपद मागितल्याची किंवा त्याबाबत चर्चा झाल्याची बातमी खोटी आहे. अशी कुठलीही चर्चा अमित शहा यांच्याबरोबर झाली नाही. आम्हाला पुन्हा सत्तेवर यायचे आहे. त्या दृष्टीने ज्या योजना आम्ही जनतेसाठी राबवित आहोत त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तेंव्हा या योजनांच्या माध्यमातून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी तसेच मित्र पक्ष मिळून एकत्रित पणे निवडणुकांना सामोरे जाण्याबाबत चर्चा झाली.