राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला आहे. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित केली, हे ऐकून आनंद झाला. पण ते कमळावर लढणार की धनुष्यबाणावर? याबाबत संभ्रम आहे, असं दरेकर म्हणाल्या.
वैशाली दरेकर माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करतील, ही नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली, म्हणून काही फरक पडत नाही. भाजप कार्यकर्ते ठरवतील पुढे काय करायचे आहे ते, असं म्हणत दरेकरांनी श्रीकांत शिंदेंचा समाचार घेतला.
कल्याण लोकसभा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असं शिंदे गटातील नेत्याचं म्हणणं आहे. परंतु, ठाकरे गटानेही याच मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकल्यापासून उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचं वर्चस्व कायम राखण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. संवाद यात्रेतून उद्धव ठाकरे त्यांच्या शिवसैनिकांना ठाण्याचा शिवसेनेचा गड कायम ठेवण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटही बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना आमचीच आहे, असा सूर आवळत आहेत. त्यामुळे खासकरून ठाणे जिल्ह्यात शिंदे विरुद्ध ठाकरे कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.