Narayan Rane On Shivsena : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्त मतदान मिळालं आहे, यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, एका निवडणुकीत मिळालेलं ते टीकेल असं नाही. आम्ही जागरूक झालो आहोत. हे राज्य जिंकावं म्हणून पुढच्या निवडणुकीत आम्ही प्रयत्न करू. महाविकास आघाडीने विधानसभेत विजयाचा दावा केला आहे, यावर राणे म्हणाले, दावा काय करतात. आम्ही आता आहोत आणि राहणार. जसं केंद्रात तिसऱ्यांदा आले आणि पंतप्रधान झाले. त्यामुळे कुणा दावा करून काही फरक पडत नाही. कोकणातून मी शिवसेना संपवली. पाच जिल्ह्यात शिवसेना कुठेच नाही. कोण आडवे आले तर त्याच्यावर पाय देऊन पुढे जाऊ. पाय बाजूला केलाय मी. या कोकणात कुणाचं बोट शिरु देणार नाही, असं म्हणत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही, म्हणून तुमच्या मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे, यावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार नारायण राणे म्हणाले, मी यावर उत्तर देणार नाही. हा माझ्या हातातला प्रश्न नाही. कुणाला मंत्री करावं, कुणाला करु नये, कुणाला मंत्री केव्हा करावं, हा वरिष्ठांचा प्रश्न आहे. हा प्रश्न संपलेला नाही. केव्हाही काहीही होऊ शकतं. महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतील, ते पक्षाच्या माध्यमातून घेतले जातील.
सिंधुदुर्गमधील कोणते प्रश्न तुम्ही मार्गी लावणार आहात? या प्रश्नाचं उत्तर देताना राणे म्हणाले, उद्योगधंदे आणि नोकरीचा प्रश्न मोठा आहे. मी त्याच्यावर काम करत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. येणाऱ्या दोन वर्षात माझ्या प्रयत्नांना यश येईल. पर्यटनासाठी आवश्यक गोष्टी, पर्यटकांना पोषक वातावरण व्हावं, यासाठी हा जिल्हा पर्यटक जिल्हा करण्यासाठी मी प्रयत्न करेन. हॉटेल व्यवसाय वाढावा, तसच इथे आलेल्या पर्यटकांना आनंद मिळण्यासाठी पोषक वातावरण आणि त्यासाठी लागणारी मनोरंजनाची साधणं मी उपलब्ध करून देईल.
इथल्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी माझे प्रयत्न असतील. महायुतीला चांगलं यश मिळालं, आम्हीच मोठे भाऊ आहोत, असं संजय शिरसाट म्हणतात, यावर बोलताना राणे म्हणाले, महायुती असल्यावर प्रत्येकाने जबाबदारीने बोलायला पाहिजे. इथे लहान-मोठा असा प्रश्न नाही. कुणी तराजू घेऊन बसला नाही. मोठा कोण आहे, हे कशावर ठरवावं, याचा आधी विचार करा.