लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केला आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या फुटलेल्या लोकांचं काम तुम्ही पाहिलं असेल. ते गुवाहाटीला जातात. तिथे रेडे कापतात. जादूटोणा करतात आणि भटकत्या आत्म्यांची पूजा करतात. त्यांना मोदींच्या रुपात भटकती आत्मा मिळाली आहे, असं संजय राऊत म्हणाले.
राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, महाविकास आघाडीत प्रधानमंत्रीपदावरून कोणतेही वाद नाहीत. काँग्रेसच्या आधी मी सांगत होतो, राहुल गांधी देशाचे नेते आहेत. त्यांनी देशाचं नेतृत्व केलं पाहिजे. इंडिया आघाडीत काहीच दम नाही, असं भाजप म्हणतं, यावर बोलताना राऊत म्हणाले, प्रधानमंत्री देशात जिथे जिथे जातात, तिथे ते काँग्रेसवर हल्ला करतात.
मोदी सांगतात, काँग्रेस राहिली नाही. महाराष्ट्रात येतात आणि शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका करतात. शिवसेना आणि राष्ट्रवादी नकली आहे. मग तुमचे भटकते आत्मे अस्थिर का झाले आहेत, तुम्हाला या भूतांना स्वप्नात सुद्धा शिवसेना का दिसते, जसं मुघलांना त्या काळात धनाजीचे घोडे दिसायचे, तसं या दिल्लीच्या, गुजरातच्या मुघलांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिसतात, असंही राऊत म्हणाले.