लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत रोड शो होणार आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीने देशाच्या प्रधानमंत्र्यांना रस्त्यावर आणलेलं आहे. मुंबईतल्या 6 जागांवर आम्ही महाविकास आघाडी लढतो आहे. त्यातल्या 6च्या 6 जागा जिंकण्याचा आमचा निश्चय आहे. मोदींना मुंबईत ठाण मांडून बसावं लागते आहे. महाराष्ट्रात आज नाशिक, नाशिकवरुन कल्याण, कल्याणवरुन इथं रस्त्यावर फिरणार. तुमच्यावर ही दारोदार भटकण्याची, रस्त्यावर फिरण्याची वेळ का आली. हे जरा लोकांना कळू द्या. प्रधानमंत्री रोड शो करतात.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, दुसरं काही काम नाही प्रधानमंत्र्यांना. मणिपूरला कधी गेलं नाहीत. आता घाटकोपरला 18 जणांचे मृतदेह सापडले. त्यांच्याविषयी त्यांच्या मनात संवेदना नाही. आज जाऊन कदाचित तिथे जाऊन नाटक करतील ते. अश्रू ढाळतील. जिथे जिथे मुंबईत मोदी जातील किंवा महाराष्ट्रात मोदी जातील तिथे तिथे भाजपचा पराभव नक्की आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो. आतापर्यंत जिथे निवडणुका झालेल्या आहेत. तिथल्या 90 टक्के जागा महाविकास आघाडी जिंकेल. असे संजय राऊत म्हणाले.