Sanjay Raut Press Conference : आम्ही तिनही पक्ष चर्चा करण्यासाठी २५ तारखेला बसणार होतो. पण काँग्रेस पक्षाची दिल्लीत महत्त्वाची बैठक आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नेते दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची २५ तारखेला होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता विधानसभा आणि संसदीय अधिवेशन होणार आहे, त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन करू. कोण कुठे जिंकणार, यावर अवलंबून आहे की, कोण किती जागा लढवणार? यावेळी शरद पवार साहेबांचा स्ट्राईक रेट नक्कीच जास्त असेल, पवार साहेबांनी १० जागा लढवल्या आणि त्यापैकी ८ जागा जिंकले. शिवसेनेने ९ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला जास्त टार्गेट करण्यात आलं. आम्ही २१ जागा लढवल्या आहेत. भाजप आणि शिंदेंकडून मुंबईच्या एका जागेवर डाका टाकला आहे. ती जागाही आम्ही जिंकलो होतो. दोन-तीन जागा अशा आहेत, आम्ही कमी फरकाने हरलो आहोत. त्यामुळे आमचाही स्ट्राईक रेट खूप चांगला आहे.
काँग्रेसचाही स्ट्राईक रेट चांगला आहे. महाराष्ट्रात २८८ जागा आहेत. कुणाला काही कमी पडणार नाही, सर्व आरामात लढतील. मोदींनी अनेक कायदे आणले आहेत. अँटी टेरेरिस्ट, अँटी करप्शन असे खूप कायदे आणले आहेत. पण ते चालत नाहीयत. भ्रष्टाचार, महागाई वाढत आहे. पेपर लीक होत आहेत. सरकार त्यांच्या हिशोबात कायदे आणतात आणि ते मोडण्याचं काम त्यांचे लोक करतात. मोदीजींच्या नेतृत्वात देश असा पुढे चाललाय की, कुणीही कायद्याला विचारत नाही. धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहेत, त्यांची नैतिक जबाबदारी आहे की, पेपर लीकच्या घोटाळ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. बिहारमध्ये असलेलं ५० टक्क्यांवरील वाढीव आरक्षण कोर्टाने मान्य केलं नाही.
महाराष्ट्रात आरक्षणावरून संघर्ष सुरु आहे. मराठा, ओबीसी, धनगर समाजाचा यामध्ये समावेश आहे. सरकार म्हणतय आम्ही टीकाऊ आरक्षण देऊ. त्या टीकाऊ आरक्षणाची जुळणी कशी करायची? महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना, नेत्यांना चर्चेसाठी सामावून घेऊन हा सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. शिष्टमंडळाने जाऊन उपोषकर्त्यांचा हा प्रश्न सुटणार नाही. कारण कोणत्याही समाजाचा नेता सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाही. जरांगे पाटील म्हणाले, माझा सरकारवर विश्वास नाही. लक्ष्मण हाकेही म्हणतात, माझा सरकारवर विश्वास नाही. सरकारवर जर नेत्यांचा विश्वास नसेल, अशावेळी सर्व पक्षीय चर्चा हाच एक मार्ग राहतो.