ठाकरे गटाच्या अग्रलेख सामनातून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, विद्यमान भाजप श्रेष्ठी तर त्यांच्या भक्त मंडळींना या हिशेबात अतिहुशार आणि सत्ताकारणाच्या जुगारातील ‘चाणक्य’ वगैरे वाटतात. अशा या चाणक्यांचे मुंबई-महाराष्ट्रातील दौरे अलीकडे वरचेवर होऊ लागलेत.
तसेच गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ‘क्रमांक एक’चा दावा करणाऱ्या भाजप-मिंधे गटाला वास्तवात महाविकास आघाडीपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या होत्या. महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठी’च्या तडाख्याने 2019 मध्ये त्यांचा येथील सत्तेचा घास हिरावला गेला आहे.निवडणुका असोत अथवा नसोत, भाजपच्या नेते मंडळींचे दौरे, बैठका, चर्चा फक्त राजकीय लाभहानीचे हिशेब करण्यासाठीच असतात. असे सामनातून म्हटले आहे.
यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही दिल्ली-मुंबई-महाराष्ट्र असे ‘अप-डाऊन’ वाढले आहे. वरचेवर ते नागपूर, कोल्हापूर, पुणे असे येत असतात. मुंबईवर तर त्यांचे विशेष प्रेम आहे. मिंधे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे जोरदार ‘इन्कमिंग’ आणि मिंधे गट-भाजपचे जोरदार ‘आऊट गोइंग’ होत आहे. असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.