Prakash Ambedkar Press Conference : ओबीसींचे १०० आमदार निवडून आले पाहिजेत, असं आवाहन आम्ही करत आहोत. शासनाने सग्यासोयऱ्यांबाबत जो चुकीचा मार्ग अवलंबला आहे, त्याला आमचा विरोध आहे. जे कुणबी आहेत, त्यांना आरक्षण आहे. शासनाने रेकॉर्डमध्ये खाडाखोड करून ५५ लाख प्रमाणपत्र दिले आहेत. ते रद्द करा, असं आम्ही शासनाला सांगतोय, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केलं. ते वंचितच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या आरक्षण बचाव यात्रेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले,ज्यांना प्रमाणपत्र मिळालं आहे, त्यांनी रितसर अर्ज करून व्हॅलिडीटी प्रमाणपत्र स्वत:हून मिळवावं. काँग्रेस, एनसीपी हे मराठा समाजाचे पक्ष आहेत, असा स्टॅम्प लागला जातोय. मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं. या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे? तुमचा अजून काही वेगळा प्रस्ताव आहे का? याच्या संदर्भात विचारणा करण्यात आली आहे. पण त्याच्या संदर्भात कुणीच काही बोलत नाही, अशी परिस्थिती आहे.
म्हणून दिवसेंदिवस परिस्थिती खालावत चालली असल्याने पक्षाच्या वतीने आरक्षण बचाव यात्रा आम्ही आयोजित केली आहे. जेणेकरून वस्तुस्थिती लोकांना कळली पाहिजे. राजकीय भूमिका ही प्रत्येकाची वेगळी असू शकते, पण त्या वेगळ्या राजकीय भूमिकेमुळं शारीरिक संघर्ष व्हावा, हिंसा व्हावी असं आम्हाला वाटत नाही. म्हणून शांततेच्या स्वरुपात आम्ही ही यात्रा सुरु केली आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.