Aaditya Thackeray Tweet : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली असतानाच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. महालक्ष्मी रेसकोर्स आणि वेलिंग्डन क्लबबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपने राजकीय हस्तक्षेप थांबवावा, यासाठी ठाकरेंनी राज्यपाल बैस यांना पत्र लिहिले आहे. आदित्य ठाकरेंनी याविषयीची माहिती ट्वीटरवर शेअर केली आहे.
आदित्य ठाकरे ट्वीटरवर काय म्हणाले?
आज मी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. बैस जी ह्यांना पत्र लिहून महालक्ष्मी रेसकोर्स आणि वेलिंग्डन क्लबबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा आणि भाजपचा राजकीय हस्तक्षेप थांबवावा, अशी विनंती केली आहे. वेलिंग्डन क्लबमध्ये मागितलेली ५० सभासदत्व ही जणू भाडेपट्टीचं नूतनीकरण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या लाचेसारखी आहेत. ती त्वरित रद्द केली पाहिजेत. रेसकोर्सचा आराखडा नागरिकांना आणि सदस्यांना दाखवणार, असल्याचेही शासनाकडून न्यायालयात सांगण्यात आले होते.
तथापि @mybmc आता अधिकृतपणे जमीन ताब्यात घेऊ पाहतेय आणि काम सुरू करण्याच्या विचारात आहे. ही जमीन बळकावून ते काम शेवटी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या आणि भाजपाच्या बिल्डर-कंत्राटदार मित्रांना सोपवायचा मनसुबा आहे. राज्यपालांनी ह्यात हस्तक्षेप करून ही लाचखोरी आणि जमीन हडपण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा.