कल्याण : वय झाल्यावर राजकारणात आणि इतर क्षेत्रात थांबायचे असते असा संकेत असतो परंतु काहीजण थांबायला तयार नाही. काहीजण हट्टीपणा करत आहेत. राजकारणात वयाची अट असते. मात्र वयाची ८०-८४ ओलांडली तरी थांबायला तयार नाही. आम्ही आहोत ना सक्षम, आम्हाला मार्गदर्शन करा ना, मी कित्येक वर्षे सत्तेत काम करत आलो आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला आहे. ते कल्याण येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
देशासमोर राज्यासमोर काय प्रश्न आहे हे लक्षात न घेता सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. मुद्दयावर बोलणं सोडून इतर विषयावर बोलत आहेत. काहीजण मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात आदेश सांगितला आहे. त्याचा आदर राखून राज्यातील, देशातील सरकार काम करत आहे परंतु कायदा हातात कुणी घेतला तर त्याचा मुलाहिजा राखला जाणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.
मान आणि शान वाढविण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखाली झाले आहे. भारत देश प्रत्येक क्षेत्रात आगेकूच करत आहे. तरुण-तरुणींच्या हाताला काम कसे मिळेल, असा प्रयत्न सुरु आहे. ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले जात आहे. घरकुल योजना राबवली जात आहे. काहींना नोकरी व काहींना व्यवसाय दिला जात आहे. शेतकऱ्यांना सहा हजार केंद्र व राज्यसरकार सहा हजार असे बारा हजार रुपये देत आहोत, असे म्हणत त्यांनी मोदींचे कौतुक केले आहे.