Laxman Hake Press Conference : छत्रपती शिवाजी महाराज आताच्या राज्यकर्त्यांना कळले असते ना, तर दिल्लीत महाराष्ट्राचा पंतप्रधान आतापर्यंत दोन-चारवेळा बसला असता. मी जबाबदारीने बोलत आहे. मला राजकीय वक्तव्य करायचं नाही. आमच्या अठरा पगड जातीचं अंतकरण तुम्हाला समजलच नाही. नेते त्यांच्या पक्षाच्या अजेंड्यावर निवडून येतात आणि पक्ष धोरण ठरवेल, त्या पद्धतीने ते वागतात. पण भुजबळ साहेब हे आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून पक्षाच्या धोरणांच्या पलीकडे जाऊन काम करतात, असं मोठं विधान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलं आहे.
लक्ष्मण हाके पत्रकार परिषदेत म्हणाले, गोपीनाथ मुंडे भाजपचे राष्ट्रीय नेते होते. परंतु, २०११ ला जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, म्हणून संसदेला घेराव घालण्यात आला होता. त्यावेळी गोपीनाथ मुंडे ओबीसींच्या बाजूनं ठामपणे उभे राहिले होते. लालूप्रसाद यादव, समीर भुजबळ हे आपला पक्ष धोरण सोडून ठामपणे भूमिका मांडत होते. आताच्या ओबीसी नेत्यांनीही ठाम भूमिका घेतली पाहिजे, असं माझं मत आहे.
आताचे लोकनियुक्त आमदार, खासदार, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आमचे हक्क आणि अधिकारांच संरक्षण करु शकत नसेल, तर आम्हालाही विचार करावा लागेल. नालायक माणसाला बाजूला ठेऊन लायक माणसाला निवडून द्यावं लागेल. वेडात मराठे वीर दौडले सात ही कुसुमाग्रज यांची कविता आहे, याप्रमाणे तुम्ही आंदोलनासाठी एकटेच निघाले होते का? यावर उत्तर देताना हाके म्हणाले, वेडात मराठे वीर दौडले सात, कारण त्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
रात्रंदिवस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय तुम्ही पुढे जात नाहीत, त्या शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा तुम्ही थोडातरी अभ्यास करावा. आम्ही अठरा पगड जाती शिवाजी महाराजांना राजा मानतो. पण शिवाजी महाराजांना सर्वात जास्त लढाई आपल्या आप्तस्वकीयांसोबत कराव्या लागल्या आहेत, असंही लक्ष्मण हाके म्हणाले.