राज्यात पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. सगळीकडे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळत आहे. यातच आता जोरदार पावसामुळे कोल्हापुरमधील पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे.
पंचगंगा नदी धोका पातळीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 40 फूट 4 इंचावर आहे. सध्या ही पाणी पातळी स्थिर आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील पूर बाधित क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे.
पाणी पातळी वाढल्यास पुन्हा काही कुटुंबांना स्थलांतरित केलं जाणार आहे. राज्यात पुढील पाच ते सहा दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 25 ते 30 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना आज संध्याकाळपर्यंतच स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.