विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजीचं बंधन शिथील होणार? अकरावी, बारावीमध्ये इंग्रजीची सक्ती नसणार. नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून माहिती समोर आली आहे. दहावीपर्यंत इंग्रजी भाषा सक्ती कायम राहण्याची शक्यता आहे.
जगातील बहुतांश देशांमध्ये व्यवहाराची भाषा म्हणून वापरात असलेल्या इंग्रजीचे अभ्यासक्रमातील बंधन शिथिल होत आहे. सध्या पहिली ते 12 वीपर्यंत इंग्रजीचे शिक्षण अविनार्य आहे. मात्र यापुढे 11वी आणि 12वीमध्ये इंग्रजीची सक्ती नसेल, असे राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून समोर आले आहे. दहावीपर्यंत इंग्रजी भाषेचे नेमके स्थान काय असेल याबाबत संदिग्धता आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आला असून त्यावर गुरूवारपासून (23 मे) 3 जूनपर्यंत सूचना आणि आक्षेप नोंदवता येणार आहेत. मातृभाषा आणि भारतीय भाषांना आराखड्यात विशेष महत्व देण्यात आल्याचे दिसते आहे. त्याचबरोबर परदेशी भाषा शिक्षणाचे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावेत अशीही सूचना देण्यात आली आहे. त्याचवेळी सध्या पहिलीपासून बंधनकारक असलेल्या इंग्रजी भाषेच्या शिक्षणाबाबत मात्र संदिग्धता दिसत आहे. तिसरीपासून बारावीपर्यंत मातृभाषा किंवा परिसर भाषेचे शिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे.