राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. तर तिसऱ्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. यावरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी आपला संताप व्यक्त केला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, इतर राज्यातून मुंबईमध्ये येऊन केलेली दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालेल. पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक फरार आहे, तोही पकडला जाईल. आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सरकारला धारेवर धरले होते. त्यांना प्रत्युत्तर देत म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार असताना गृहमंत्री जेलमध्ये गेले होते, उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब लावले होते. आमच्या सरकारच्या काळात जो कायदा हातात घेतो त्याला आम्ही सोडत नाही. आमच्या सरकारमध्ये आरोपीने पोलिसावर गोळी चालवली तर म्हणतात कशी चालवली. आरोपीच्या बाजूने बोलणारे हे लोक डबल ढोलकी आहेत. बदलापूर केसमध्ये विरोधकांनी आरोपीची बाजू घेतली होती.