बीडमध्ये 11 जुलै रोजी शांतता रॅली होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मराठा समाज बांधवानी बीड जिल्ह्यात शांतता रॅली काढण्यास केलेल्या मागणीनुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवा पसरवून जाणीवपूर्वक काहीजण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बातमी पूर्णपणे चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी आहे.
वस्तुतः जिल्हा पोलीस प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही. रॅली होईल व नेहमीप्रमाणे माझ्या बीड जिल्ह्यातील समाजबांधव अत्यंत शांततापूर्ण मार्गाने रॅली पूर्ण करतील असा मला विश्वास आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 1998 सालापासून आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडून समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा दिलेला आहे. कृपया कोणीही अफवा पसरवून किंवा समाजात बुद्धिभेद करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, ही विनंती. असे धनंजय मुंडे म्हणाले.