नागपूर विमानतळ विस्तारीकरणाचे भूमिपूजन आज संपन्न झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते महाराष्ट्रातील ₹7600 कोटींच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. नागपूरमध्ये देशातील आधुनिक विमानतळ होत आहे. कार्गो आणि प्रवासी विमानतळ होत आहे. नागपूरसाठी 13 हजार कोटींची कामे करण्यात आली आहेत. ओबीसीसाठी एकाच दिवशी 52 हॉस्टेलचे उद्घाटन होत आहे. ज्या ठिकाणी हॉस्टेल झाले नाही, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवणाची व निवास भत्याची सुविधा देण्यात येणार आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठा काल निवडणूक निकालामुळे भाजपला घेण्याची संधी पाहत होते. भाजपचा पराभव हरियाणात झाल्यावर शस्त्र चालवण्याची त्यांनी पूर्ण तयारी केली होती. परंतु त्यांना ती संधी मिळाली नाही. आता देशाचा मूड काय आहे, ते त्यांना लक्षात आले आहे. त्यामुळे कालपर्यंत आम्ही एकत्रित असणारे ही तिन्ही पक्ष ”हम आपके हैं कौन” म्हणत आहेत. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह तयार केला होता. आता विधानसभा निवडणुकीत हा फेक नॅरेटिव्ह ब्रेक झाला आहे. फेक नॅरेटीव्ह पूर्णपणे संपला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
नागपूर विमानतळ उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. "मिहान सुरू झालं होतं. पण एअरपोर्ट पाहिजे त्या प्रमाणात प्रगत झाले नव्हते. जीएमआर कंपनीला काम दिले. कोर्टात गेले, महायुती सरकार आल्यावर हायकोर्टात ते सुप्रीमकोर्टापर्यंत लढा दिला. त्यानंतर आता हे काम आज सुरू होत आहे. 7 हजार कोटींची काम करण्यात येणार आहेत. यामध्ये दोन धावपट्टीच्या कामाचा समावेश आहे. पण नागपुरात विकसित एअरपोर्टवर दोन रनवे होणार आहेत. देशातील सर्वात चांगली इमारत, दीड कोटी प्रवासी, नऊ लाख टन कार्गो हँडल करू शकेल अशी या विमानतळाची क्षमता असणार आहे. औद्योगिक केंद्र म्हणून या विमानतळाचा महाराष्ट्राचा विकास होईल.
दरम्यान, इतरही विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. मेडिकल कॉलेजच्या कामाची सुरुवात करण्यात आली. यामुळे महाराष्ट्रातील मेडिकल विद्यार्थ्यांना 1 हजारपेक्षा जास्त जागा उपलब्ध होतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. रेकॉर्डब्रेक वेळेत न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर गतीने काम होत आहे. त्याच वेगाने विकास काम पूर्ण व्हावे. अशी अपेक्षा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.