लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अनेक ठिकाणी दौरा सुर केला आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्वाचं विधान केलं. फडणवीस म्हणाले, अमरावतीची जागा भारतीय जनता पक्ष लढेल. नवनीत राणा विद्यमान खासदार आहेत. त्यांनी ५ वर्ष भाजपची आणि मोदींची बाजू मांडली आहे. पण अंतिम निर्णय आमची पार्लमेंट कमिटी घेईल.
फडणवीस पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडून ज्या उमेदवाराची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्याठिकाणी एकूण निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मी दौरा करत आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये आम्ही जाणार आहोत. आज आम्ही अकोल्यात आलोय. उद्या आम्ही वर्ध्याला जाणार आहोत. जाहीर प्रचाराआधी सर्व व्यवस्था नीट लावायच्या. सर्व प्लॅनिंग करायचं. काही अडचणी असतील तर त्या दूर करायच्या. अकोला आणि वाशिमच्या टीमनं चांगली तयारी केली आहे.
जो उमेदवार असेल, तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल. जिथे भाजपचा उमेदवार असेल, तिथे महायुतीनं भाजपला पाठिंबा द्यायचा आहे. जिथे राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला उमेदवार मिळतील, तिथे आम्ही त्यांचं काम करायचं. हर्षवर्धन पाटील जेव्हापासून भाजपमध्ये आले आहेत, त्यांनी सातत्याने भारतीय जनता पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासारखं नेतृत्व मोठं झालं पाहिजे, ही भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे. हर्षवर्धन पाटील आमच्या महायुतीच्या उमेदवाराचं काम करतील, याचा मला विश्वास आहे.