भाजपाची पहिली यादी आली तरी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटत नाही. प्रामुख्याने विदर्भातील जागांवरून शिवसेना UBT आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. विदर्भातील जास्तीत जास्त जागा मिळाव्या अशी दोन्ही पक्षांची मागणी आहे. त्यात 12 जागांसाठी ठाकरे आग्रही आहेत. यात रामटेक आणि दक्षिण नागपूर या दोन्ही जागांवरील दावा सोडण्यात कुणी माघार घेत नाही त्यामुळे तिढा आणखी वाढत चालला आहे. रामटेक, कामठी, दक्षिण नागपूर, वरोरा, आरमोरी, भंडारा, बुलढाणा, सिंदखेडराजा, आर्णी, वर्धा, यवतमाळ, दिग्रस या जागांसाठी ठाकरे आग्रही आहेत.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती असताना शिवसेनेने विदर्भात 12 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र शिवसेना फुटीनंतर सध्या दोन्ही पक्ष आघाडीत एकत्र आले आहेत. त्यानंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे गुंतागुंत वाढली आहे.
एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष जागांवर अडून बसलाय तर काँग्रेस आपले पारंपरिक मतदारसंघ सोडायला तयार नाही. विदर्भासाठी आता दिल्ली दरबारी तोडगा काढण्याचे सुरु असलेले प्रयत्न यशस्वी होणार का याकडे लक्ष वेधलं आहे.