Chhagan Bhujbal Press Conference : आमच्या विरोधात काहीतरी सुरु आहे, असं जेव्हा आपल्याला वाटेल, त्यावेळी आमचे लोक या आंदोलनात क्रियाशीलपणे उतरल्याशिवाय राहणार नाहीत. आम्हाला एक धक्का नाही, तर तुमच्या कुणबी प्रमाणपत्राने अनेक धक्के देऊन आम्हाला बाहेर काढलं आहे. आता सर्वकाही सगेसोयऱ्यांनाच द्या, असंही काही लोक म्हणतात. ८० टक्के आलो आहोत, आता फक्त २० टक्के आहेत. आम्हा मराठा आहोत, असं सांगणार आणि कुणबी प्रमाणपत्र परत घेणार. कुणबी प्रमाणपत्र घेताना सांगा आम्ही कुणबी आहोत. आरक्षणाच्या वेळी कुणबी आहेत आणि इतर वेळी ते मराठा आहेत. काही लोक ओबीसीमधून एकच अर्ज करेल, ईडब्लूएसमध्ये तोच माणून दुसरा अर्ज करेल. त्यानंतर एसईबीसीमध्ये तोच माणूस पुन्हा अर्ज करेल, अशाप्रकारे फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. यासाठी आधारकार्ड जोड देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ती सूचना मान्य केली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी दिलीय. ते पुण्यात मंगेश ससाणे यांच्या उपोषणादरम्यान बोलत होते.
पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले, आमची सर्व मंडळी मैदानात लढणारी आहेत. काही जण न्यायालयात लढणार आहेत. गेल्या दहा दिवसांपासून हे सर्वजण उपोषणाला बसले आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. पण तब्येत हळूहळू बिघडत जाते आणि अचानक काहीतरी नवीन प्रकरण समोर येतं. जे तुम्हाला आम्हाला परवडण्यासारखं नाही. हे आपले सर्व वाघ लढाईसाठी पाहिजे आहेत. ही लढाई संपलेली नाही. ही लढाई फार लांब जाणार आहे. इथेच काही संपणार नाही. ही लढाई सोपी नाही.
मंगेश ससाणे उपोषणाला बसले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे चुकीचं घडत असेल, त्यावेळी कोर्टात उभे राहतात. त्यांनाही धमक्या येतात. एखादा पोलीस त्यांच्यासोबत द्या, असं आम्ही पोलिसांना सांगतो. वेगवेगळ्या ठिकाणी लोक उपोषणाला बसले आहेत. मी सर्वांना विनंती करतो की, सगळ्या ठिकाणी आम्हाला जाणं शक्य नाही. काही ठिकाणी इतर कार्यकर्ते जातात. पण त्यांनी उपोषण मागे घ्यावं. आपण आंदोलन सोडलेलं नाही किंवा थांबवलेलं नाही. आपण आंदोलन फक्त स्थगित करणार आहोत.
येणाऱ्या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केलीय, यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले, छगन भुजबळ मोठे नेते आहेत. त्यांचा विचारही मोठा असतो. राजकीय आरक्षण देण्यासाठीच संविधानात बदल करावा लागेल. मला असं वाटतं संविधानात बदल करण्यासाठी राष्ट्राचं मत एकत्र यावं लागेल. प्रत्येक जण आपापल्या भूमिका मांडत असतो. प्रत्येकाला त्याच्या हक्काचं आणि न्यायाचं मिळालं पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिकला येऊन काय केलं? असा सवाल थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे.