आज परभणीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवल्यामुळे अनेक भागात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागात गंभीर परिस्थिती असल्याची माहिती दिली आहे. सध्याची परिस्थिती पाहता सरकार पाण्याचे नियोजन करत असल्याचे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, अनेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. यासाठी आम्ही मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आताच काय उपाययोजना करता येईल याचा आढावा घेण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. अनेक प्रकल्पात गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. मी घाबरवत नाही, पण परिस्थिती गंभीर आहे. या सर्व परिस्थितीचा आम्ही आढावा घेत आहोत. तसेच पाणीसाठा लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गवताचे लिलाव करु नये, अशा सूचना वन विभागाला देण्यात आल्या आहेत. तर, शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ठोस मदत करण्याचा प्रयत्न आमच्याकडून करण्यात येत आहे. सध्याची परिस्थिती पाहून गाफील राहता कामा नये, पाण्याचे नियोजन करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
पुढे म्हणाले की, "सध्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. परभणीसह संपूर्ण मराठवाड्याला कमी पावसाच्या झळा बसत आहेत. मात्र आम्ही दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी बैठक घेतली. पुढे गणेशाचे आगमन होणार आहे, गोपाळकाला आहे, नवरात्र आहे. पुढे आणखी पाऊस पडायचा आहे. अद्याप परभणीत 43 टक्के पाऊस पडला आहे. दोन पावसात अंतर मोठं पडलं आहे. मराठवाड्यात केवळ नांदेड आणि हिंगोलीतच थोडी बरी परिस्थिती आहे.त्यामुळे दिलासा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.