Aditya Thackeray Interview : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून येत्या २० तारखेला पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-भिवंडी या महत्त्वाच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभांचा धडाका सुरु आहे. अशातच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी लोकशाहीशी बोलताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. आनंद दिघे आणि बाळासाहेब यांचं नात कसं होतं? ठाण्यात गेल्यावर तुम्हाला कसा अनुभव येतो? या प्रश्नाचं उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, मतदारसंघात गुंडगिरी, दादागिरी सुरु आहे, ते कुणाला पटत नाही. वैशाली दरेकर यांना जनतेचा पाठिंबा आहे. राजन विचारे यांच्या प्रचारासाठीही ठाण्यात गेलो होतो. शक्तीस्थळाला जाऊन दर्शन घेतलं. कल्याण, ठाण्याचं शिवसेनेशी वेगळं नातं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच शिवसेना आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, राजन विचारे आणि नरेश म्हस्के यांच्यात कशाप्रकारे राजकीय संघर्ष होईल? यावर प्रतिक्रिया देताना आदित्य म्हणाले, राजन विचारे नगरसेवक, आमदार आणि आता खासदार पदापर्यंत पोहोचले आहेत. गेल्या अनेक वर्षात त्यांनी काम करुन दाखवलं आहे. कुठेही मारामारी, खंडणी आणि गुंडगिरीचा प्रकार त्यांनी केला नाही. सभ्य व्यक्तीप्रमाणे त्यांनी काम केलं आहे. आधीपासूनच ते आमचे उदेवार म्हणून जाहीर होते. मिंधे गटात उमेदवारीवरून वादविवाद सुरु आहेत.
दुसऱ्या कोणत्या उमेदवाराने लढायचं नाही, म्हणून ही भांडणं सुरु आहेत. कारण त्यांना महितीय की, त्यांची सीट शंभर टक्के पडणार आहे. महाराष्ट्रात आवाज उठवणारे दिल्लीत आहेत. ते निवडून येणं गरजेचं आहे. एकीकडे इंडिया आघाडी सरकार येत आहे, पण दुसरीकडे पाहिलं तर भाजपमध्ये एकाच व्यक्तीची मन की बात चालते. हे असं चालणार नाही. गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातून आपण भाजपला निवडून दिलं आहे.
आपल्या डोक्यावर घटनाबाह्य सरकार बसवलं. तरीही महाराष्ट्राचा अपमान सुरु आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला त्यांना बाजूला करून ठेवायचं आहे. त्यांना लोकशाही बंद करून टाकायचे. हे सर्व घडत असताना आपण किती दिवस शांत बसायचं? हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे जात आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.