राज्य सरकारकडून टीम इंडियातील चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे. या चारही खेळाडूंना राज्य सरकारकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटींचं बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत मिळत नसेल आणि आकडे फुगवून सांगून खोटं नेरटिव्ह सेट करत असतील. खोटं बोला रेटून बोला हे यांचा पर्दाफाश जनता करेल. प्रश्न हा आहे की, 11 कोटी देण्याची आता गरज होती का? कारण खेळाडू हे देशासाठी खेळतात. 120 कोटी रुपये तसेही त्यांना बीसीसीआयने दिलेलं आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, एवढी मोठी रक्कम ईनामाच्या रुपात दिल्यावर आपल्या तिजोरीतून पैसे देण्याची गरज काय होती? पण आता स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. तिजोरी संपली तरी चालेल, गरीब मेला तरी चालेल. पण माझ्या पाठिवर थाप पडली पाहिजे. खेळाडूंना मदत केली पाहिजे. खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपली क्षमता असेल किंवा अंथरुन पाहून पाय पसरले पाहिजे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.