मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात अटल सेतू प्रकल्पाचे आज शुक्रवारी, १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करता येणं शक्य होणार आहे. हा देशातील सर्वात लांब समुद्री पूल असणार आहे. मुंबईतील विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजनही होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून नवी मुंबईत पंतप्रधान मोदींचं आगरी-कोळी परंपरेने स्वागत होणार आहे.
मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणाऱ्या या २२ किमी लांबीच्या पुलावरून जाणाऱ्या वाहनांना वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. ट्रॅक्टर, रिकाम्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर, प्राण्यांकडून ओढण्यात येणारी वाहने आणि हळू चालणारी वाहने, मोटारसायकल, स्कूटर, तीन चाकी टेम्पो, ऑटो रिक्षा, या वाहनांचा प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सुमारे 400 कॅमेऱ्यांमार्फत वाहनांवर नजर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
वेगवान वाहतूक, वेळ आणि इंधनाची बचत या उद्देशाने उभारण्यात आलेल्या एमटीएचएलवर जाणाऱ्या वाहनांना वाहतूक विभागाकडून वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. या संबंधित पत्र वाहतूक विभागाचे अपर पोलिस आयुक्त एम रामकुमार यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे. अटल सेतूवर वाहनचालक ताशी 100 किमी वेगाने वाहनं चालवू शकणार आहेत. एमएमआरडीएकडून त्याबाबत माहिती देण्यात आली आहे.