राजधानी दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या हवेची गुणवत्ता देखील दिवसेंदिवस बिकट होतेय. दिवाळीत वाजवण्यात आलेल्या फटाक्यानंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली आहे. यात सोमवारी कमी वेगाने वाहणारे वारे, कमी तापमान, उच्च आर्द्रता आणि वाहनांचे प्रदुषण अशा अनेक कारणांमुळे दक्षिण मुंबईतील म्हणजे कुलाबा या परिसरातील हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही वाईट झाल्याची माहिती वायू प्रदुषण तज्ञांनी दिली आहे. मुंबई शहाराच्या दक्षिणेकडील टोक असलेल्या कुलाबा या परिसरातील हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही बिकट होत आहे.
पुणेस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑलॉजीने विकसित केलेल्या हवेची गुणवत्ता आणि हवामान अंदाज आणि संशोधन प्रणाली SAFAR नुसार, कुलाब्यामध्ये सोमवारी हवेची गुणवत्ता AQI (हवा गुणवत्ता निर्देशांक) ३४५ होती, तर यावेळी दिल्लीतील हवेची गुणवत्ता कमाल ३३१ होती. परंतु काही दिवसांपूर्वी दिल्लीतील हवेची गुणवत्ता AQI ४७१ पर्यंत म्हणजे प्रदूषणाच्या विक्रमी पातळीपर्यंत नोंदवण्यात आली होती. हवा प्रदुषणाच्या या अत्यंत वाईट परिस्थितीमुळे दिल्लीतील बहुतांश नागरिकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतोय.