मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यात शेतीचे आणि लोकांच्या आर्थिक मालमत्तेचे बरेच नुकसान झाले आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार अमरावती जिल्ह्यात (Rainfall in Amravati) सुरु आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूर स्थिती निर्माण झाल्याने शेतीसह अनेक घराचं देखील नुकसान झालं आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट देवून त्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचे नुकसान आणि व्यथा ऐकून यावेळी त्यांच्या अश्रूंचा बंध फुटला.
पाऊस सुरू असताना त्यांनी खार तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची चिखलात जाऊन पाहणी केली. यावेळी नवनीत राणा यांनी चिखलातुन पुराच्या पाण्यातून वाट काढत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील अनेकांच्या घराची पावसाने पडझड झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आहे. ही परिस्थिती बघताना खासदार नवनीत राणाचे अश्रू अनावर झाले.