मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. सुधारित अध्यादेश सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार आहेत. जरांगे पाटलांची विजयी सभा आज वाशीमध्ये पार पडणार आहे. मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांची वाशीत होणाऱ्या विजयी सभेत एक-दोन नव्हे तर तब्बल सात जेसीबीच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्यांवर फुलांची उधळण करण्यात येणार आहे.
मनोज जरांगेंना सुधारित अध्यादेश सुपूर्द करण्यात आला असून त्या अध्यादेशामध्ये सगेसोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे. यासोबत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, सरकारने सगेसोयरेबाबतचा जीआर दिला आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याबाबत आदेश दिले आहेत. तसेच वंशावळीसाठी तालुका स्तरावर समिती नेमली. आरक्षणावर अधिवेशनात कायदा येणार. आता मुंबईला जाणार नाही. वाशीत विजयी सभा असणार आहे.