शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांच्या मधील वादाची अख्या महाराष्ट्रात चर्चा रंगली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे त्याच्यातील वाद आता निस्तरला आहे. हा वाद शांत झाल्यानंतर आता यावर बोलताना वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रवी राणा आणि बच्चू कडू यांना टोला लगावला आहे.
प्रकाश आंबेडकर हे सध्या अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद म्हणजे खोका तसाच राहिला फक्त आरोपावरती पडदा पडला, असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युती होणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वंचित आणि शिवसेना यांच्या युतीची एकच चर्चा सुरु आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना आज अकोला येथे युती संबंधी प्रश्न विचारला असता त्यावर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.
आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद संपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांना बोलावून घेतले होते. या दोन्ही नेत्यांची समजूत घालण्यात आली होती. त्यानंतर रवी राणा यांनी माध्यमाशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली होती. सोबत आमच्यातील वाद संपल्याचे जाहीर केले होते त्यानंतर बच्चू कडू यांनी काल अमरावतीत जाहीर मेळावा घेऊन वाद संपल्याचं जाहीर केले. पण आपल्या भाषणात ते रवी राणा यांना इशाराही देण्यास विसरले नाही.