मुंबई : पक्ष चोरला चिन्ह चोरले. पण, ठाकरेंनी मुंबईत इंडिया एकत्र आणली, असे म्हणत उध्दव ठाकरेंनी भाजपवर शरसंधान साधले. ठाकरे गटाचा मेळावा आज रंगशारदा येथे पार पडला. यावेळी उध्दव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. घराणेशाहीवर बोलत असतात. मी तुमच्या घराणेशाहीवर बोलत नाही. कारण तुमचं घराणेच नाही. आधी कुटुंब सांभाळा मग आमच्या घराण्यावर बोला, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करण्यावरुन उध्दव ठाकरेंनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, या सरकारने आता गॅस सिलिंडर स्वस्त केला आहे. मला आजही आठवतं आहे २०१२ साली सुषमा स्वराज यांनी मला फोन करत भारत बंद करायचा असल्याचे सांगितले. मी बाळासाहेबांना विचारलं, मला म्हणाले गणपतीच्या दिवशी? छट् त्यांना सांगून टाक आम्ही गणपतीचा सण असताना भारत बंद वगैरे काही आंदोलन करत नाही. त्याही वेळा गणपतीच्या दिवसात यांनी भारत बंद केला होता. मी त्या आंदोलनाला गेलो आणि दुसऱ्या दिवशी माझा फोटो आला गॅस सिलिंडर हातात घेतलेला. त्यानंतर मला बाळासाहेबांनी मला झापलं. बाळासाहेब माझ्यावर चिडलेच होते. त्यावेळी गॅसचा दर काय होता? आज काय आहे? पाहा. आता 200 रुपये कमी केले आहे पाच वर्षे लुटायचं आणि दोनशे रुपयांची सूट द्यायची. हे सगळे जुमले आहेत त्यावर यांनी इमले बांधले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. हे गॅसचे दर कमी केलं आणि डाळींचे जैसे थे मग शिजवायचे काय, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
डिसेंबरमध्ये निवडणुका होणार असल्याचे सांगत आहेत. यासाठी हेलिकॉप्टर बुक केल्याचीही चर्चा आहे. पण, यापूर्वी सुद्धा अशी परिस्थिती होती. मात्र, तेव्हाही विरोधक जिंकले होतं. कर्नाटकमध्ये बजरंगबलीचा नारा देऊन पण भाजप का हरली? तर तिकडे लोकांनी भ्रष्टाचार पाहिला आहे. खोके घेऊन हे सरकार आलं आहे. सरकारी योजनांचे पैसे ग्रामीण भागातील लोकांना पैसे आलेत का? लोकांचा सरकारवरचा विश्वास उडाला आहेत. पण सरकार जाहिरातीवर विश्वास ठेवत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना नाही तर प्रधानमंत्री आभास योजना. चंद्रावर घर देणार असं म्हणतात. आपण म्हणूं मला माहिती आहे भेटणार नाही पण हा मूर्ख घर देतोय, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी टीका केली आहे.