निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दिल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या या सभेला उत्तर देण्यासाठी आता शिंदे गटाने देखील त्याठिकाणी सभा आयोजित केली आहे. दरम्यान, या सभेनंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. आता त्या टीकेवर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, खेडच्या सभेत संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, सभा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिमगा आहे. त्यामुळे शिमग्याला बोंब मारणं, सहज स्वाभाविक आहे. काल शिमगा होता, त्यामुळे रामदास कदम किंवा गुलाबराव पाटील यांनी शिमग्याला बोंब मारली असेल तर ती आपण समजून घेऊ. याच्या पलीकडे त्यांना अधिक काय महत्त्व द्याव. असा टोला लगावला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, योगेश कदमांनी अत्यंत दर्पयुक्त आणि अहंकाराने भरलेली वाक्य वापरली. परंतु, आम्ही बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे ज्या पद्धतीने ही सगळी मंडळी बडबड करत आहेत. त्याही पेक्षा लोकांच्या दरबारात जाऊन लोकांचे म्हणणे काय आहे, हे ऐकून घेणे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते काय बोंब मारतात. त्यावर उत्तरे देण्यापेक्षा आम्हाला शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांशी बोलणे जास्त गरजेचे वाटते. बाकी योगेश कदमांचे काय होणार? रामदास कदमांच्या भांडी घासण्याच्या विधानाचे काय होणार? हे निवडणुका ठरवतील. ते वैरी असले तरी आम्ही त्यांच्या सुखाची आणि मांगल्याची कामना करणारे लोक आहोत. असेही त्या यावेळी म्हणाल्या.