शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील दोन्ही गटात दिवसांदिवस वाद वाढतच चालला आहे. या वादादरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या गटाला दिल्यानंतर शिंदे गटाविरुद्ध ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यावरूनच आता शिंदे गट आमदार शहाजीबापू पाटील यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे.
काय म्हणाले शहाजीबापू पाटील?
श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या राऊतांच्या आरोपावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, खरं तर या संजय राऊतांचे आडनाव बदलून नामकरण करून संजय आगलावे असे ठेवायला पाहिजे. कारण ते महाराष्ट्रभर आग लावत फिरत आहेत. एक निष्पाप, प्रामाणिकपणे चांगले काम करणारे तरुण तडफदार नेतृत्व श्रीकांत शिंदेंचे आहे. अशा तरुण नेतृत्वावर असे घाणेरडे आरोप करणं संजय राऊतांनाच काय, कुणालाच शोभत नाहीत. परंतु, सध्या राऊत कुणाविषयी काय बोलतील, याचा काही नेम राहिलेला नाही. अशी टीका त्यांनी यावेळी राऊतांवर केली.