मुंबई : मुंबईमध्ये रस्त्यांचा काँक्रिटीकरण प्रकल्पावरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत केलेले विधान बालिशपणाचे आहे. त्यामुळे लहान मुलाकडे आम्ही लक्ष देत नाही, असा जोरदार टोला दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत केलेले विधान बालिशपणाचे आहे. लहान बाळाच्या हातून खेळणे घेतल्यावर ते रडते. तसा हा प्रकार आहे. त्यामुळे लहान मुलाकडे आम्ही लक्ष देत नाही, अशी टीका दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे. दरवर्षी नवीन रस्ते बनवूनही त्यांना खड्डे पडत होते. रस्त्यांचे पैसे कुठे जात होते हे लोकांना कळलय. आमच्या काळात मुंबईचा विकास होणार. अनेक प्रकल्प उभे राहत आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.
दावोस दौऱ्यावरुन मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्यात येत होती. दावोसऐवजी गुजरातला जा आणि आमचे गेलेले प्रकल्प परत आणा हे म्हणणं अत्यंत पोरकटपणाचं विधान होतं. दावोसमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद असते. या परिषदेत जगभरातील लोक आलेली असतात. यामध्ये भारताचा पर्याय स्वीकारणं याचे मुख्य कारण म्हणजे भारताची सुधारलेली अर्थव्यवस्था आहे. जी मोदींमुळे सुधारली आहे. मोदींच्या आकर्षणामुळे भारताकडे जशी लोक आकर्षित झाली. तसेच महाराष्ट्रामध्ये असलेले नवीन नेतृत्वाकडे आकर्षिक होत आहे. तेथील भारतीय लोक देखील सांगत होते तुम्ही योग्य निर्णय घेतला.
46 तास मुख्यमंत्री दावोसमध्ये होते. त्यामध्ये फक्त चार तास झोपले आणि 42 तास वेगवेगळ्या देशाच्या प्रतिनिधींना भेटले. एक लाख 39 हजार कोटींचे व्यवहार केवळ आता झालेत. मात्र अनेक लोक महाराष्ट्रामध्ये येऊन पुढचे करार करणार आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.