नाशिक पदवीधर मतदारसंघातील जागेमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. दुसरीकडे भाजपने त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही. भाजप तांबे यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा देखील होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीत प्रचंड वाद निर्माण झाला. त्यानंतर काँग्रेसने सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर आता काल पक्षाने सत्यजित तांबे यांना निलंबित केले आहे. त्यावरच आता या निलबंनानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले सत्यजित तांबे?
२२ वर्षं मी काँग्रेसमध्ये काम केलं आहे. जन्मल्यापासून मला फक्त काँग्रेसच माहिती आहे. माझ्या रक्तात काँग्रेस आहे. माझ्या श्वासात काँग्रेस आहे. आम्ही काँग्रेस सोडून कधी दुसरा विचार केला नाही. अनेक लोक अनेक पक्षांमध्ये गेले, आले. मोठे झाले. पण आम्ही कधी तशी भावना ठेवली नाही. आम्ही एकनिष्ठतेनं आम्ही पक्षाबरोबर राहण्याचं काम केलं आहे. असा विधान त्यांनी यावेळी केले.
२०३० साली माझ्या परिवाराला काँग्रेसमध्ये १०० वर्ष पूर्ण होणार आहेत. माझ्या पणजोबा-आजोबांपासून आम्ही सतत चार चार पिढ्या काँग्रेसमध्ये काम करत आहोत. सत्ता येतात, जातात. सत्तेची पदं आमच्यासाठी फार महत्त्वाची नाहीत. सत्ता आम्ही जन्मल्यापासून पाहातो आहोत. ८३ सालचा माझा जन्म आहे. ८५ साली थोरात साहेब आमदार झाले. त्याआधी माझे आजोबा भाऊसाहेब थोरात हेही आमदार होते. त्यामुळे सत्ता हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा नाही. राजकारणात आपण काय काम करण्यासाठी आलो आहोत, ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. असे सत्यजित तांबे म्हणाले.