मुंबई: संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. भिडे यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट दिसून येत आहे. अशातच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भिडेंच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
राऊत म्हणाले, ज्याप्रमाणे हरियाणामध्ये दंगली झाल्या, मणिपूरमध्ये सुरू आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्रात अशा पद्धतीचे वातावरण सुरू व्हावं यासाठी फडणवीस आणि गुरुजी मंडळ तणाव निर्माण करत आहेत. परंतु, राज्याची जनता सुज्ञ आहे. तुम्ही 'गुरुजींची' पूजा करत बसा, असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
सोबतच इंडिया बैठकीबद्दलही त्यांनी माहिती दिली आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला इंडियाची बैठक होणार आहे. सदर बैठक ही मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत महान, झारखंडचे हेमंत सुरेन, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे असे अनेक प्रमुख लोक या बैठकीला उपस्थित राहतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.