राजकारण

...तरच मराठा आरक्षण टिकेल अन्यथा ही फसवणूक ठरेल; संभाजी राजेंचा घणाघात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुन्हा मागासवर्गीय आयोग गठीत करावा. त्या आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवावे आणि मग आरक्षणाची रचना ठरवावी. तरच मराठा आरक्षण टिकेल अन्यथा अध्यादेश काढून दिलेले आरक्षण ही फसवणूक ठरेल, असे संभाजी राजे भोसले यांनी म्हंटले आहे. सरकारच्या जीआरनंतरही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजी राजेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे.

संभाजी राजे म्हणाले की, जरांगे पाटील अनेक वर्षांपासून लढत आहेत. आधी त्यांची मागणी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणात द्यावीत आणि आता ते म्हणतायत की संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत. पण, असे दिलेले आरक्षण टिकेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी सर्टिफिकेट देऊन दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार असेल तरच द्यावे अन्यथा ती समाजाची फसवणूक ठरेल.

उच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने का रद्द केले हे ध्यानात घ्यायला हवे. कारण सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारताना म्हंटलं की, तुम्ही पुढारलेले आहात, मागासवर्गीय नाहीत. मग आता कसे आरक्षण देणार हे आधी स्पष्ट करावे लागेल. आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण करुन त्यासाठी आयोग गठीत करुन मराठा समाजाला मागास ठरवावे लागेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात वकिल बदलण्यात आले. मी याबाबत विचारले तर मला ऑफ रेकॉर्ड सांगण्यात आले की आधीचे महागडे वकील परवडत नाहीत कपिल सिब्बल वगैरे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने दिलेला अहवाल महत्वाचा आणि उत्तम आहे. माझा सरकारला प्रश्न आहे की तुम्ही मागासवर्गीय आयोग पुनर्गठीत करणार का? त्या आयोगामार्फत मराठा समाज मागास ठरणार का आणि मग त्यानंतर कशा पद्धतीने आरक्षण देणार, असे प्रश्नही संभाजी राजेंनी विचारले आहे.

मागील दीड-दोन वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारला अनेकदा पत्रव्यवहार करुन याबाबत विचारणा केली. मात्र उत्तर देण्यात आले नाही. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण समन्वय समितीने आतापर्यंत काय केले हे सांगावे. सरकार लोकांच्या भावनांशी खेळतंय. मराठा समाजाला अध्यादेश काढून दिलेले आरक्षण टिकणार नाही. सरकारमधे अनेक जाणकार लोक आहेत. त्यांनी याची दखल घ्यावी. माझ्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाबाबत दोन टक्के अधिक माहिती आहे. मग गेले दीड वर्ष तुम्ही गप्प का बसलात असा प्रश्नही संभाजी राजेंनी फडणवीसांना विचारला आहे.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?