पुणे : राज्याच्या राजकारणात सात्यत्याने काहींना काहींना घडत आहे. यातच रोहित पवार यांनी राजकीय भूंकप होणार असे संकेत दिले आहे. पवार यांच्या या संकेताला भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी प्रत्यत्तर दिले आहे. सत्ता गेल्याने सुतक पडल्याचं रोहित पवार यांच्या चेहऱ्यावर जाणवतं आहे. तसेच रोहित पवार यांनी नवीन ज्योतीचा धंदा उघडला की काय अशा शब्दात आमदार राम सातपुते यांनी पवार यांच्यावर कडव्या शब्दात टीका केली आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी एक ट्विट केले होते. यामध्ये ते म्हंटले, जेव्हा भूंकप येणार असतो तेव्हा पक्षांचं वर्तन बदलत असतं. ही एक प्रकारे भूकंपाची पूर्वसूचना असते. सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांची कामानिमित्त भेट झाली आणि काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या, अशा स्वरुपाचे ट्विट रोहित पवार यांनी केले होते. आता त्यांच्या या ट्विटला भाजप आमदार राम सातपुते यांनी उत्तर दिले आहे.
आमदार सातपुते म्हणाले, सत्ता गेल्यापासून रोहित पवार यांच्या चेहऱ्यावर सुतक पडल्याचे सातत्याने दिसून येत आहे. रोहित पवार म्हणतात की राजकीय भूकंपाचे पूर्वसूचना मिळाली. मात्र तुमचे सरकार असताना मुख्यमंत्री किती आमदारांना भेटत होते. किती आमदारांचे काम होत होती? असा सवाल देखील सातपुते यांनी केला.
तसेच बारामतीचा विकास केला म्हणजे महाराष्ट्राचा विकास केला अशी पवारांची धारणा होती. म्हणूनच 40 आमदार फुटून तुमच्या नाकाखालून भाजपासोबत आले. अहो जनाची नाही तर मनाची तरी विचार करा... तुम्ही कोणाबद्दल बोलतायत? आज इथे बाळासाहेबांचे शिलेदार शिंदे आणि फडणवीस यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले आहेत. रोहित पवार यांनी नवीन नवीन ज्योतिषाचा धंदा उघडला की काय? असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात उभा राहतोय. तुम्ही याचा विचारच करू नका, हे सरकार अत्यंत ताकदीने महाराष्ट्राची सेवा करतेय. शिंदे - फडणवीस यांच्या नेतृत्वात तसेच भाजप व बाळासाहेबांचे शिलेदार हे सरकारच्या पाठीशे ठामपणे उभे आहेत असेही सातपुते म्हणाले.