अमरावती : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर नववर्षात आज पहिलीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली आहे. यादरम्यान, न्यायालयाने पुढील तारीख दिली असून 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यानंतर आमदार रवी राणा यांनी अमरावतीत मोठं विधान केलं आहे. ठाकरे गटात केवळ तीनच सैनिक राहणार असल्याचा टोला राणांनी लगावला आहे.
सध्या संपूर्ण राज्यातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा मिळतो आहे. ९० टक्के खरे शिवसैनिक शिंदे सोबत आलेत. ठाकरे गटात केवळ ३ लोक राहतील. ज्यात केवळ, आदित्य ठाकरे, अनिल परब, आणि संजय राऊत यांचा समावेश असेल. उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा झटका बसणार आहे, असा टोला रवी राणा यांनी केला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आमचे घटनेवर प्रेम आहे. 14 फेब्रुवारीपासून घटनापीठ हे सलग सुनावणी घेणार आहे. हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आज मुख्य न्यायधीशांनी महाराष्ट्राचे आम्ही ऐकू, असे सांगितले आहे. 14 फेब्रुवारी रोजी व्हेलेंटाईन डे असून या दिवशी सर्व काही प्रेमाने होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.