नवी दिल्ली : भाजप आज 44 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात ध्वजारोहण केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्षांची कारस्थाने सुरूच राहतील. पण, देशातील गरीब, तरुण, माता, भगिनी, दलित, आदिवासी, प्रत्येकजण भाजपचे कमळसाठी ढाल बनून उभा आहे, असे मोदींनी म्हंटले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजपसाठी देश सर्वोपरि आहे. भाजप सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्राने काम करत आहे. भाजपच्या धोरणाचा सर्वांना फायदा होणार आहे. जेव्हा हनुमानजींना राक्षसांचा सामना करावा लागला तेव्हा ते तितकेच कठोर झाले. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराचा प्रश्न येतो, घराणेशाहीचा प्रश्न येतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतो तेव्हा भाजपही तितकाच दृढ असतो, असा निशाणा त्यांनी विरोधकांवर साधला.
द्वेषाने भरलेले लोक आज खोट्यावर खोटे बोलत आहेत. हे लोक इतके निराश झाले आहेत की ते उघडपणे म्हणू लागले आहेत मोदीजी, तुमची कबर खोदली जाईल. त्यांनी कबरी खोदण्यास सुरुवात केली आहे. या पक्षांना एक गोष्ट कळत नाही, आज देशातील गरीब, तरुण, माता, भगिनी, दलित, आदिवासी, प्रत्येकजण भाजपचे कमळसाठी ढाल बनून उभा आहे.
ते म्हणाले, आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या या पक्षांची कारस्थाने सुरूच राहतील. पण, देशवासियांची स्वप्ने आणि आकांक्षा दडपताना आणि संपुष्टात येताना आपण पाहू शकत नाही. म्हणूनच आमचा भर देशाच्या विकासावर आहे, आमचा भर देशवासियांच्या कल्याणावर आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेससारख्या पक्षांची छोटी स्वप्ने पाहणे संस्कृती आहे. पण, मोठी स्वप्ने पाहणे आणि त्याहूनही अधिक साध्य करणे ही भारताची राजकीय संस्कृती आहे. यासाठी जे शक्य होईल ते करा, असेही पंतप्रधानांनी म्हंटले आहे.