संजय देसाई | सांगली : मराठा आरक्षणाप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली. याप्रकरणी निजामकालीन ‘कुणबी’ नोंद असणाऱ्या मराठा समाजास ‘कुणबी’ दाखले देण्याबाबत समिती अहवाल तयार सादर करणार असल्याची माहिती शिंदेंनी दिली आहे. परंतु, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला असून जीआरमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
शिवशक्ती परिक्रमाच्या निमित्ताने सांगलीमध्ये पंकजा मुंडे यांचा मोठ्या जल्लोषात भाजपाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यादरम्यान शहरातील सांगलीचे आराध्यदैवत गणपतीचा पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतलं. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, कोणीतरी घोषणा करून, आरक्षण मिळणार नाही. संविधानिक मार्गाने आरक्षण द्यावे लागेल, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. तसेच, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.
काय आहे मुख्यमंत्र्यांची घोषणा?
मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देता यावे यासाठी अशा प्रकरणांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे व कार्यपद्धती निश्चित करण्याकरिता निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत आहे. ही समिती महसुली, शैक्षणिक व संबंधित नोंदी तपासून मागणीनुसार निजामकालीन ‘कुणबी’ नोंद असणाऱ्या मराठा समाजास ‘कुणबी’ दाखले देण्याबाबत अहवाल तयार करून तो एक महिन्यात सादर करेल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
यावर मनोज जरांगे-पाटील यांनी आक्षेप घेत म्हणाले, आज किंवा उद्या जीआरमध्ये सुधारणा करा. आमच्याकडे वंशावळीचे दस्तावेज नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. वंशावळ या शब्दात सुधारणा करा, सरसकट प्रमाणपत्र द्या. निर्णयाचे स्वागत पण आंदोलन सुरुच राहणार, असे त्यांनी म्हंटले आहे.