राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. त्यानंतर त्याच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यामुळे एकच गदारोळ निर्माण झाला आहे. पवार साहेबांशी चर्चा करूनच आम्ही सरकार स्थापन केले, असे फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी देखील प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले सुप्रिया सुळे?
देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटाबाबत माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारले असता त्यावर त्या म्हणाल्या की, तुम्ही जो प्रश्न विचारत आहात, तो मुळात देशातील चर्चेचा मुद्दाच नाही. तो फक्त देवेंद्र फडणवीसांना राजकारणासाठी कदाचित सोयीचा असेल. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या बातम्या लागत नसतील, म्हणून ते सध्या शरद पवारांचा सहारा घेत असतील, अशीही शक्यता आहे. असे त्या यावेळी म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कारण बिचाऱ्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पक्षामध्ये बाकीचे लोक हलायला जागा देत नसतील. त्यामुळे ते पवारांचं नाव घेऊन दररोज काहीतरी नवीन वावड्या उठवत आहेत, अशी शक्यता आहे. कारण या राज्याची सहा-सहा खाती त्यांच्याकडे आहेत. गृहमंत्री आणि उर्जामंत्री म्हणून ते अपयशी ठरले आहेत. ज्या व्यक्तीकडे अर्थमंत्रीपद आहे आणि त्याच्यावर अर्थसंकल्पाची जबाबदारी आहे. अशा व्यक्तीला अशी कंड्या पिकवायला (गॉसिप) वेळ कसा मिळतो? त्यामुळे मला आपल्या राज्याची चिंता वाटायला लागली आहे. असा टोला सुळेंनी फडणवीसांना लागावला.