शिवसेनेतील बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील बंड झाले आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीत देखील आता दोन गट निर्माण झाले आहेत. या दरम्यान आता राष्ट्रवादीतील नेते मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नेमकं काय म्हणाले वळसे पाटील?
मंचरमध्ये बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, डिंभे धरणाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सामुदायिक होता. शपथविधी होण्याअगोदर साधारण पंधरा दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याशी बोलणं झालं होतं, परंतु त्यांनी भाजप सोबत जाऊ नये, असे पवार म्हणाले होते. असा खळबळजनक स्फोट त्यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, भाजप सोबत जाण्यासंदर्भात पक्षाच्या बैठका होत होत्या. त्यातील चर्चा आम्ही सुप्रिया सुळे यांच्या कानावर टाकली. त्यांना, तुम्ही साहेबांना सांगा, असे म्हटले. दोन-तीन दिवसांत साहेब उत्तर येणार होते, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी आम्हीच साहेबांकडे गेलो आणि त्यांना भूमिका सांगितली. त्यानंतर आता जवळपास ४० आमदारांनी अजित पवार यांची साथ दिली. सोबतच लवकरच शरद पवार साहेबांची वेळ घेऊन त्यांना भेटणार आहे. असे वळसे पाटील यांनी सांगितले.